Thursday 29 June 2023

माझा ब्लॉग माझा विचार - शिक्षणाची वारी

 


शिक्षणाची वारी

-----------------------------------

" नाही झाले पंढरीशी कधी जाणे

मुलांसाठी काहीच ठेवणार नाही उणे "

 शाळा हीच आमची पंढरी , विद्यार्थी हेच माझे दैवत " 

दरवर्षी जून महिन्यात पंढरीची वारी सुरू होते.संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई,संत सोपानदेव इत्यादी अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरकडे  विठू माऊली च्या दर्शनासाठी रवाना होतात. हरिनामाचा जयघोष करत असंख्य वारकर्‍यांचे पाऊले पंढरीच्या दिशेने वळू लागतात.अगदी त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांची पाऊले जूनमध्ये सुट्टी संपल्यानंतर शाळेकडे अर्थात ज्ञानमंदिराकडे वळू लागतात."शाळा हीच पंढरी व शिक्षक हेच विठू माऊली "ही भावना मुलांच्या निरागस चेह-यावर दिसते.शिक्षकांप्रती असलेली आपुलकी मनात कायम घर करून बसलेली असते.आणि शिक्षक सुध्दा या ज्ञानरूपी निरागस, लोभस,अजान वारक-यांमध्ये विठ्ठलाला शोधत असतो.

मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम कुंभार करीत असतो.मातीला एकजीव करत असतांना तो तल्लीन होऊन जातो.परमेश्वराच्या चरणी लीन होतो.कामात परमेश्वर पाहतो.अगदी त्याप्रमाणेच शिक्षक आपल्या अध्यापनात लीन होतो.घरादाराची आठवण त्याला येत नाही. एवढं तादात्म्य, विषयरूप होऊन जातो, तो आमचा गुरूजन. भजनात,हरिपाठात जसे वारकरी तल्लीन होऊन नाचतात तसाच आमचा शिक्षक कविता,गाण्यात तल्लीन होऊन मुलांसोबत एकरूप होऊन भान हरपून नाचत असतो. वारकरी दिवसभर भजन हरिपाठात रमून जातो. रात्री पालखी तळावर भोजन झाल्यावर कसलीही काळजी चिंता मनात येत नाही. रात्री निवांत झोपी जातो. तसेच दिवसभर  शिक्षक मुलांमध्ये समरस होतो,अध्यापन करतो.कृतीतून धडे कविता , बालगीते,गाणी शिकवतो.नाट्य,नृत्य शिकवतो.जेव्हा घरी येतो तेव्हा आत्मिक समाधानाची लाली त्याच्या चेहर्‍यावर उजळलेली असते. घरातील मुलाबाळांसोबत जेवण करतो.समरस होतो.रात्री समाधानाने झोपी जातो.

आषाढीच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिंड्या पंढरीकडे वाटचाल करीत असतात.शिक्षणाच्या वारीतही शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासून दिंडी सुरू होते.विविध शालेय महोत्सव,जयंत्या , वृक्षलागवड,स्वच्छता अशा विविध विषयांवर वर्षभर दिंड्या काढल्या जातात. शिक्षणाचे वारकरी,धारकरी अगदी तनमनधनाने यात सहभागी होतात.पंढरीच्या वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे गोल रिंगण हे रिंगण पार पडत असतांना माऊलीचा अश्व रिंगणात गोल फेरी मारतो. त्यावेळेस अश्व गेल्यानंतर वारकरी माती श्रध्देने कपाळाला लावतात.माऊलीचा विठुरायाचा जयघोष करतात. मराठी शाळांमध्ये उपक्रमांचे रिंगण,परिपाठ, श्लोक, पसायदान, विविध मनोरंजक खेळ,मैदानी खेळ वर्षभर चालू असतात. मैदानावरील मातीने शाळेतील हे शिक्षणाचे वारकरी कधी माखतात हे कळून सुध्दा येत नाही.एवढे मातीशी एकरूप होतात.शिक्षणातील पांडुरंग माझा शिक्षक हे सगळं तन्मयतेने, कुतूहलतेने पाहत असतो.शिष्याची प्रगती पाहत असतांना तो मनातून नक्कीच सुखावतो.

पंढरीच्या वारीत सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने सहभागी होतात.जातीभेद नसतोच मुळी मुखात एकच नाम 'विठुमाऊली ' शिक्षणाच्या वारीत सर्व जातीधर्माचे विद्यार्थी,पालक, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी होतात.एकमेकांत मिसळून जातात. शाळेसाठी एकरूप होऊन जातात. विद्यार्थी हितासाठी झटत असतात. जिल्हा परिषदेची मराठी शाळा ही एकमेव शाळा ज्या शाळेत सर्वजातीधर्मातील मुलेमुली प्रवेश घेतात.एकमेकांवर जातीधर्माच्या भिंती ओलांडून निस्सीम बंधू,भगिनी प्रमाणे प्रेम करतात.सर्व जगताला सर्वधर्मसमभावाचा संदेश  जसा आमचा विठुराया देतो.तसाच आमचा शिक्षकही हा संदेश मुलांमध्ये रुजवतो, सर्वदूर पोहचवतो.

पंढरीचा पांडुरंग संताना  आपल्या कडेवर ,अंगाखांद्यावर घेतो. त्यांचे कोडकौतुक करतो.

तसाच आमचा शिक्षक मुलांचे लाड करतो.मुलांच्या आरोग्याची काळजी घेतो.लहान मुलांचे डोळे पुसतो त्यांना कडेवर घेतो.त्यांना खाऊ देतो.गाणे, कविता म्हणतो.त्यांच्या सुख दु:खात सहभागी होतो.वारी अखंडपणे,अव्याहत सुरूच राहणार आहे.विठूमाऊलीचा जयघोष सुरूच राहणार आहे.संत ज्ञानेश्वर,संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत चोखामेळा आदी संताचा जयघोष ,नाव वर्षानुवर्ष दिंडीच्या माध्यमातून वारीत घुमणार. 

शिक्षणाची वारीही वर्षानुवर्ष अव्याहतपणे सुरू आहे.उपक्रमांचे रिंगण फिरत आहे.शैक्षणिक दिंड्या अविरत चालूच आहे.सर्वधर्मसमभावाचा संदेश सर्वदूर जातो आहे. आम्ही एक आहोत.आमची पंढरी शाळा आहे.मुलांमध्ये आम्ही उद्याचे संत ,महंत, कीर्तनकार,शास्त्रज्ञ , डाॅक्टर,इंजिनिअर,गुरूजन 

प्रशासकीय अधिकारी , पदाधिकारी , आदर्श नागरिक,उद्योजक बघत आहोत.घडवत आहोत.शिक्षणाची वारी अखंडपणे,अव्याहतपणे सुरू राहील.आपणही या वारीत तनमनधनाने सहभागी होऊ , सहकार्याची भावना ठेवू , सकारात्मक राहू, गुरूजनांचा मान राखू , एकजुटीने शाळेच्या विकासासाठी,विद्यार्थ्यांसाठी झटू या "आपली शाळा, मराठी शाळा " हा संदेश दूरवर पोहोचवूया 


राम कृष्ण हरी 🙏

आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


 - कैलास भागवत , संगमनेर 

9011227586

Monday 12 June 2023

माझा ब्लॉग माझे विचार - शाळेतील पहिले पाऊल





                                          शाळेतील पहिले पाऊल 


मुलांची पहिली शिक्षिका 'आई ' असते.आई व मुलाचे नाते नाजूक असते.स्वतःला विसरून मुलांना घडविणारी आई असते.मूलाच्या जन्मापासून आई मुलाला घडवित असते. 

तसेच घरातील वडील,आजी ,आजोबा यांचेही संस्कार मुलांवर होत असतात.हसणं,रडण,

रागावणं,रुसणे अशा चेह-यावरील हावभावातून मूल व्यक्त होत असते.हळूहळू आई, बाबा अशा नावाने ते हाका मारते नंतर इतर शब्द ऐकून बोलण्याचा मूल प्रयत्न करते.परिसरातूनही मूल शिकत असते.परिसरातून विविध शब्द त्याच्या कानावर पडत असतात त्या शब्दांचे उच्चार बालक करीत असते.घर,परिसरातील बोलली जाणारी बोलीभाषा ते शिकत असते.बोलण्याचा प्रयत्न करते.बालकाचे पालनपोषण,आहार याची काळजी आई करत असते.बाळाला काय आवडते, काय नावडते हे आई बघते. त्याप्रमाणे त्याला भरवण्याचा प्रयत्न करते.

 पूर्वप्राथमिक शाळा अर्थात अंगणवाडीत आईच्या पदराला धरून बालक जाते.तेथे खेळते,बागडते.गाणी ,गोष्टी ऐकते.जसजसे बालकाचे वय वाढत जाते.तसे ते चालते,बोलते स्वतः काम करण्याचा प्रयत्न करते.शाळेत जाण्याच्या वयाचे ते होते. बालकाचे सहा वर्ष पूर्ण झालेले असतात.मूलाचे पाल्य मुलांना कोणत्या शाळेत पाठवायचे,शाळा कशी आहे.शिक्षक कोणते आहेत. याविषयी शेजारीपाजारी,परिसरात,

नातलगात,गावात मित्रमंडळींबरोबर चर्चा करतात.आपल्या मुलाचे भविष्य उज्वल घडवावे ही त्यांची भावना असते.

प्राथमिक शाळेत मुलाचे पहिले पाऊल पडणार असते.केवढा आनंद आईला व घरादाराला झालेला असतो. शाळेविषयी मनात कुतूहल असते.आपल्या गावातील मराठी शाळा,"आपला अभिमान मराठी शाळा "ज्या शाळेत आपण शिकलो त्याच शाळेत आपले मुले शिकणार याचा मनस्वी आनंद पालकांना झालेला असतो.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

'आई' नंतर मूलांचा गुरू अर्थात 'शिक्षक 'असतो.शिक्षक चांगल्या राष्ट्राचा आदर्श निर्माता असतो.मातीच्या गोळ्याला  आकार देण्याचे काम जसा 'कुंभार 'मेहनतीने आपल्या कल्पक हाताने करतो.व छानसे मडके तयार करतो.अगदी त्याप्रमाणे शिक्षक मुलांना घडविण्याचे त्यांना संस्कारीत करण्याचे काम करतात.

सुट्टीनंतर शाळा सुरू होत आहेत.तोपर्यंत आपल्या मुलांना शाळेची सवय लागावी मुले शाळेत नवीन प्रवेशित होणार आहेत. नवीन शिक्षक,नवीन मित्र मुलांना मिळतील शाळेचे वेळापत्रक, जेवणाच्या वेळा याची सवय आतापासूनच पालकांनी मुलांना लावावी.तसेच आपली शाळा कशी असेल छान खेळण्यासाठी मैदान असेल का ? गाणे ,गप्पा , गोष्टी होतील का ? नाचायला,गाणे गायला  मिळेल का?अशी  उत्सुकता मुलांना असेल त्यासाठी पालकांनी मुलाला गावात जाऊन शाळा दाखवण्यास हरकत नाही.

लहान मुले हट्टी असतात मला हे पाहिजे ते नको असा घोषा लावतात जे योग्य असेल ते दिले पाहिजे परंतू एखादी वस्तू,पदार्थ नको हे सुध्दा त्यांच्या मनावर  बिंबवले पाहिजे मुलांना त्या वस्तूचे,पदार्थाचे फायदे,तोटे समजावून सांगणे गरजेचे असते.मुलांना नकार पचवता आला पाहिजे.

 "आरोग्य सुदृढ तर मन सुदृढ" मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाचा,पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे.तरच त्यांचे लक्ष  अभ्यासाकडे लागेल.

मुलांना जेवणाच्या डब्यात काय द्यावे हा विचार आईच्या  मनात येत असेल.हल्ली मुलांना बाहेरील खाऊ जास्त आवडतो.कुरकुरे,वेफर्स वडापाव, हे पदार्थ मुलांच्या डब्यात देऊ नका मुलांना पौष्टिक पदार्थ बनवून द्या.सुका मेवा व चपाती भाजी यांचा समावेश डब्यात करावा.घरी बनवलेला चुरमुरे चिवडा,खजूराचे लाडू , फुटाणे,गूळ शेंगदाणे,मनुके , नाचणीचे बिस्कीटे यापैकी दररोज कोणत्याही एकाचा पौष्टिक आहार म्हणून समावेश करावा.म्हणजे मुले बाहेरील पदार्थ खाणार नाहीत.पालेभाज्या, कडधान्ये,ज्वारीची भाकरी किंवा चपाती यांचा समावेश दुपारच्या जेवणात असावा.शाळेतील पूरक आहाराचा सुध्दा लाभ घ्यावा. आतापासूनच घरी मुलांना शाळेतील वेळापत्रका प्रमाणे सवय लावावी.लवकर उठणे, वेळेवर आवरणे ,जेवण करणे , वेळेत अभ्यास करणे , खेळणे , लवकर झोपणे असे नियोजन आताच करा.  शेजारील मुलांशी मैत्री करणे त्यांच्याकडून शाळेविषयी, शिक्षकांविषयी जाणून घेणे.हे सुध्दा खूप महत्वाचे असते.  

शाळेतील पहिल्या दिवशी शाळेसाठी आपल्या पाल्यासाठी वेळ द्या. शिक्षकांशी , वर्गशिक्षकाशी मुलामुलीं विषयी बोला.त्यांचे गुण , छंद , आवड सांगा.

शाळेतील पहिला दिवस नक्कीच आनंदात जाणार शाळेतील पहिले पाऊल सकारात्मक, आनंदी,उत्साही नक्की पडेल . शिक्षणाचा श्रीगणेशा होईल.

- कैलास भागवत, संगमनेर 9011227586